ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, October 29, 2011

९७. प्रवाह : सामाजिक कार्याचा: भाग १



(’साप्ताहिक विवेक’च्या २०११च्या दीपावली विशेषांकात प्रसिद्ध झालेला लेख.)

संस्था, सामाजिक काम, कार्यकर्ते, विकास ....हे सगळे शब्द माझ्या आयुष्यात खूप उशीरा आले .. पण एकदा आले ते राहिले सोबत.

अनेक वर्ष वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी, सामाजिक कामांशी वेगवेगळ्या भूमिकांतून जोडले गेले आणि या विषयावर विचार होत राहिला, हवे असोत की नको असोत अनुभव येत राहिले. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना दोन तीन वर्ष केलेल ‘स्वयंसेवी’ काम, नंतर एका तपाहून अधिक काळ केलेल ‘पूर्ण वेळ काम’; त्यानंतर दशकभर सामाजिक संस्थेत केलेल ‘पगारी काम’ आणि सध्या आंतरराष्ट्रीय संस्थेत करत असलेले आणखी एक ‘पगारी’ काम यातून सामाजिक कामाशी माझ एकदा जुळलेलं नात अबाधित राहिल – त्या नात्याचे ताणेबाणे बदलत गेले अर्थातच! एके काळी कार्यकर्त्यांव्यातिरिक्त माझ्या दुसर कोणी ओळखीच नव्हत; आता आज मात्र कार्यकर्ते भेटतात ते एखादया वर्कशॉप, सेमिनारमध्ये किंवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर!

संकल्पनेची ओळख

सामाजिक संस्थेशी माझा पहिला संबंध आला तो पुण्यात मी शिकायला आल्यावर. पुण्यात मी ज्या वसतिगृहात राहिले, ते महाविद्यालयाच वसतीगृह नव्हत – तर एका संस्थेच होत. ‘समाज’ शब्द तोवर नागरिकशास्त्रात येऊन गेला होता आणि वर्तमानपत्रांतही  तो वारंवार यायचा – त्यामुळे तो शब्द माहिती झाला होता. पण संस्था, कार्यकर्ते, सामाजिक काम हे शब्द नव्यानेच कळले.

मी ज्या वसतिगृहात राहिले तिथे अनेक कार्यकर्ते होते. यातले बहुतेक कार्यकर्ते नोकरीपेशातून निवृत्त झालेले होते. दिवसातला काही काळ ते वसतिगृहाच्या कामासाठी द्यायचे. ते लोक या कामासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नसत. त्यांनी हे काम करण्यामागे काही निश्चित ‘विचार’ होता. ‘खेडयातल्या मुला-मुलींना अतिशय कमी खर्चात पुण्यात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण’ या विचाराने ही संस्था स्थापन झाली होती. हा विचार पटणारी नवनवीन मंडळी संस्थेच्या संपर्कात येत. त्यातले काही वेळ देत. इतर मंडळी देणगी देत. पैशांसाठी ‘’देणगी’ हा एक नवा शब्द समजला, तोवर फक्त वर्गणी शब्दच माहिती होता.

ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली अनुभवी मंडळी होती. त्यांची कौशल्य वेगवेगळी होती, पार्श्वभूमी वेगवेगळी होती, स्वभाव वेगवेगळे होते, ते काही एकमेकांना आधीपासून ओळखत नव्हते. पण ‘विचार’ हा त्यांना एकत्र आणणारा, बांधून ठेवणारा धागा होता.

त्या कार्यकर्त्यांकडे पाहताना अनेक गोष्टी कळल्या. एक म्हणजे सामाजिक काम करायच तर काही स्पष्ट ध्येय हवं. त्या ध्येयापर्यंत जाण्याची निश्चित योजना हवी. ही योजना अंमलात आणायची तर त्यासाठी पुरेस मनुष्यबळ आणि पैसा हवा. काम चांगल चालायचं तर व्यवस्था, नियम हवेत आणि मुख्य म्हणजे परिस्थितीचे आकलन असणारं,  दूरदृष्टी असणारं, आणि निर्णय घेऊ शकणारं नेतृत्व हवं. माझ्या मनात तेव्हा एक मूलभूत सिद्धांतच तयार झाला म्हणा ना! मला ही सगळी चौकट फार आव्हानात्मक आणि कदाचित म्हणूनच आकर्षक वाटली.

एका बाजूने सामाजिक कामाबद्दल आकर्षण निर्माण होत असताना दुसरीकडे त्याबद्दल अनेक प्रश्नही पडत होते. समाज म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे काय? दुस-यांचं दु:ख आपलं वाटणं हा कृत्रिमपणा नाही का? जो प्रश्न आपला नाही त्यावर आपण उत्तर कसं शोधू शकतो? कल्याणकारी राज्य असताना सामाजिक संस्थांची काय गरज? – असे अनंत प्रश्न. मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असल्यामुळे समाजशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हे मला माहिती नव्हतं!

याच काळात पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरता ‘सामाजिक जाणीव प्रकल्प’ सुरु झाला. त्यात मी सहभागी झाले. जवळच्या पोलीस वसाहतीत रोज संध्याकाळी जायचं आणि तिथल्या मुला-मुलींचा अभ्यास घ्यायचा असा आम्हाला झेपणारा कार्यक्रम आम्ही निवडला. आपल्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत माणसं जगतात, राहतात, वाढतात याचं एकदम भान आलं. आता मागे वळून पाहताना जाणवतं की ज्या खेड्यात मी वाढले, तिथेही अन्याय. विषमता, शोषण होतं. उदाहरणार्थ, चावडीवरून जाताना स्त्रियांनी चेहरा पदराने पूर्ण झाकून घ्यायचा, चपला हातांत घ्यायच्या, महारांनी, मांगानी घरात प्रवेश करायचा नाही, अंगणातच बसून राहायचं असे  गावचे नियम होते. पण तेव्हा ते ‘सामाजिक प्रश्न’ आहेत अस कधी जाणवलं नव्हतं. पुढे कधीतरी राजस्थानमधल्या स्त्रियांशी ‘बालविवाह’ या विषयावर चर्चा चालू असताना एकजण म्हणाली, “वह समस्या थोडे ही है? वह तो हमारी परंपरा है” – तेव्हा लक्षात आलं की, आतला आणि बाहेरचा अनुभव आणि त्यातून तयार होणारा दृष्टिकोन यात अंतर राहतं, तरी सामाजिक प्रश्न कळायला तो आपला व्यक्तिगत प्रश्न असलाच पाहिजे अशी गरज नाही. तसच प्रश्न आणि परंपरा एकमेकांत गुंतलेले असतात. कोणताही सामाजिक प्रश्न कळण्यासाठी संवेदनशीलता असणं महत्त्वाचं.

त्या दिवसांत अभ्यास सांभाळून (खरं तर तो मागे ठेवून) आम्ही भरपूर काम केलं, भरपूर प्रयोग केले, भरपूर चर्चा केल्या, भरपूर वाचलं, थोर मंडळींना ऐकलं. संस्था, संघटना, रचनात्मक काम, संघर्षात्मक काम, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद, दलितांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, वेश्यांचे प्रश्न, खेड्यांचे प्रश्न ......... कोणताही एक विषय निवडायचा, तज्ज्ञांशी चर्चा करायची, वाचायचं, लिहायचं, वाद घालायचे असे दिवस होते ते. सामाजिक कामांत वेगवेगळे विचारप्रवाह आहेत याच भान मला आलं ते याच काळात. किरकीटवाडीची झोपडपट्टी जळाली तेव्हा पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर उभं राहून पैसे गोळा करताना लोकांची बरे वाईट अनुभव आले – लोकांचा सामाजिक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दोन टोकांचा आहे हे जाणवलं. महापालिका शाळांतील मुला-मुलींसाठी उपक्रम चालवताना ‘व्यवस्थेचे’ अनुभव आले.

चार पाच वर्ष स्वयंसेवी काम केल्यावर जाणवलं की, नुसतं काम करत राहणं, नवे प्रयोग करत राहणं कधीकधी दिशाहीन असतं आणि म्हणून दमवणूक करणारं असतं. वैचारिक पाया पक्का करायचा आणि कामाच क्षेत्र विस्तारायचं अशा दुहेरी विचारांनी मी पूर्ण वेळ काम करायचा निर्णय घेतला आणि थेट देशाच्या दक्षिण टोकाला  पोचले.

आता माझी भूमिका बदलली. ‘स्वयंसेवक कार्यकर्ता’ ते ‘पूर्ण वेळ कार्यकर्ता’ हा एक मूलभूत बदल होता. आता ‘’काही सांभाळून’’ काम करायच नव्हतं, तर फक्त कामच करायच होत. इथ काम का करायचं, त्यातून काय साधायचं, काय करायचं, कोणी करायचं, कस करायचं याबाबत एक निश्चित योजना आधीच ठरलेली होती – त्यामुळे चर्चा करायला फारसा वाव नव्हता. विचारप्रणाली पक्की होती; संस्थेचा पसारा मोठा होता, देशाच्या विविध भागांत काम होतं, व्यवस्था होती, नियम होते. वेगवेगळ्या शहरांत एक-दोन पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर स्थानिक पातळीवरचे अनेक स्वयंसेवी कार्यकर्ते अशी रचना होती. अशा दोन संघटनाचे मी पूर्ण वेळ काम केले.

पुढे मी नोकरी केली तीही एका मोठया सामाजिक संस्थेत.

सामाजिक संस्थांचे विविध प्रकार

सामाजिक काम करणा-या विविध प्रकारच्या संस्था आहेत. काही संस्था भूकंप, दंगली, अपघात, पूर अशा प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या काळात लोकांची मदत करतात. काही संस्था केवळ कल्याणकारी कामांत असतात – शिक्षणासाठी मदत करणं, मोफत ग्रंथालय चालवणं, विनामूल्य पाणपोई चालवणं, शिक्षण संस्था चालवणं ही काही उदाहरणे झाली. काही संस्था व्यवस्था बदलण्यासाठी कार्यरत असतात. सामाजिक प्रश्नांवर जागृती करणं, धोरणात्मक परिवर्तनासाठी काम करणं, राजकीय व्यवस्था बदलणं, कायदयातले बदल, सामाजिक प्रश्नांवर संशोधन करणं असेही कामाचे आणखी काही प्रकार आहेत. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की सामाजिक कामाची विभागणी दोन मुख्य प्रकारच्या कामांत करता येते – रचनात्मक आणि संघर्षात्मक.

सामाजिक कामाकडे आणखी एका पद्धतीने पाहता येतं. सेवा या दृष्टिकोनातून काम करणं, विकासाच्या प्रक्रियेकडे आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाहणं; सामाजिक कामाला समाजातील दुर्बल घटकांच्या सबलीकरणाच्या प्रक्रियेचे माध्यम मानणं, आणि काही एका विचारप्रणालीचा प्रसार करण्यासाठी काम करणं.

आपल्या देशाच्या संदर्भात बोलायचं झाल तर सामाजिक कामाची परंपरा फार जुनी आहे असं म्हणावं लागेल. दानाचं महत्त्व फार जुन्या काळापासून सांगितल गेलं आहे. दारी येणा-या ‘अतिथि’ला सन्मानान भोजन द्यावं, भिका-याला भिक्षा द्यावी अशी धारणा होती. दुस-यांना आणि विशेषत: संकटात सापडलेल्यांना मदत करण्यातून ‘पुण्य’ मिळत ही कल्पना एका अर्थी धार्मिक असली, तरी पुष्कळशी सामाजिक आहे यात शंका नाही. ब्रिटीश साम्राज्याच्या काळात सामाजिक सुधारणांच महत्त्व अनेक विचारवंतांच्या लक्षात आलं आणि सामाजिक कामाला नवसंजीवनी मिळाली.

सामाजिक संस्थांचे आकारानुसार, विस्तारानुसारही विविध प्रकार आहेत. एका गावात किंवा काही मर्यादित गावांत (अथवा शहरांत) काम करणा-या संस्था आहेत. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांत पण एकाच राज्यात काम करणा-या संस्था आहेत. एकापेक्षा जास्त राज्यांत काम करणा-या संस्था आहेत. केवळ एका विषयावर – जसे शेती किंवा आरोग्य – लक्ष केंद्रित करून काम करणा-या संस्था आहेत, तशाच ‘एकात्मिक विकास’ अशा नावाने अनेक विषयांवर (खर सांगायचं तर ज्या कोणत्या विषयावर काम करायला पैसे मिळतात त्या कोणत्याही विषयावर, प्रश्नावर) काम करणा-या संस्था आहेत. सामाजिक कामासाठी छोट्या संस्थांना देणगी उपलब्ध करून देणा-याही संस्था आहेत. अनेक उद्योग समूहांचे स्वत:चे ट्रस्ट आहेत.

संस्था संघटना याचाही वेगळा विचार मी इथे करत नाही. साधारणपणे रचनात्मक काम करणा-या त्या संस्था आणि संघर्षात्मक काम करणा-या त्या संघटना अशी मी ढोबळमानाने विभागणी करते आहे – ती  सगळ्या प्रकारच्या परिस्थितीत योग्य असेल असे नाही; अपवाद असणारच!

सामाजिक संस्थांचे तीन मुख्य प्रकार आज सभोवताली दिसतात. ते म्हणजे स्वयंसेवी संस्था,  व्यावसायिक दृष्टीने काम करणा-या ‘ बिगर सरकारी संस्था” आणि तिसरे म्हणजे ’देणगी देणा-या’ संस्था. यातल्या तिस-या प्रकारच्या संस्थेत काम करण्याचा फारसा अनुभव माझ्या गाठीशी नाही म्हणून पुढची चर्चा केवळ स्वयंसेवी आणि  बिगर सरकारी संस्थांबाबत आहे.
स्वयंसेवी संस्था

ज्या सामाजिक संस्थेत सगळे  लोक स्वयंसेवी  वृतीने काम करतात, कोणीही पगारी नोकर असत नाही,  ती संस्था स्वयंसेवी. पण अशी पूर्ण  स्वयंसेवी संस्था आज  अभावानेच आढळेल . ज्या  संस्थांचे  पहिल्या फळीचे कार्यकर्ते स्वयंसेवक आहे ती स्वयंसेवी अशी सुधारित व्याख्या आता करावी लागेल.  या प्रकारच्या संस्थांचा पसारा एके काळी प्रचंड होता आणि आजही आहे.  विशिष्ट विचारप्रणालीवर आधारलेल्या, कामाचे विस्तारीत क्षेत्र असलेल्या आणि अनुभव असलेल्या ‘स्वयंसेवी’ संस्थांचे चित्र आज साधारणपणे कसे दिसते?

एक म्हणजे स्वयंसेवी संस्था आता श्रीमंत झाल्या आहेत – आता त्यांना पैशांची कमतरता भासत नाही. त्यांची कार्यालये पाहिली की ही बाब सहज लक्षात येते. दोन चार हजारांची देणगी सहज देऊ शकणा-या लोकांची संख्या वाढली आहे हे निश्चित. पण या ठिकाणी मनुष्यबळाची मात्र वानवा दिसते. नवे रक्त कामात उतरताना दिसत नाही किंवा त्यांचं कामातलं सातत्य कमी पडत. अनेक संस्थांमध्ये ‘अनुभवी’ माणसे असतात, त्यांच्याकडे विचार असतात, कल्पना असतात, अनुभव असतात – पण त्यांच्याकडून धावपळ होत नाही. धावपळ करायला अनेक संस्थांत आता माणसंच नाहीत अस विदारक चित्र आहे. याचा अर्थ तरुण माणसं सामाजिक कामात नाहीत असा नाही – त्यांना बहुधा इथ नुसता ‘सल्ला’ देणा-या माणसांचा कंटाळा येतो अशी मला शंका आहे.

पर्यावरणासारख्या क्षेत्रात स्वयंसेवी वृतीने – स्वत:चा वेळ, पैसा, कौशल्य खर्च करणा-या – काम करणा-या तरुण तरुणींची संख्या लक्षणीय आहे. पण तरुण माणसं विचारप्रणालीवर आधारित कामात कमी येतात असे चित्र दिसतं. त्याची कारण तरी काय आहेत? जीवन धावपळीचे झाले आहे, माणस स्वत;च्या कुटुंबासाठीसुद्धा मनाजोगता वेळ देऊ शकत नाहीत हल्ली; ही वस्तुस्थिती आहे. छोट्या समजल्या जाणा-या शहरांतही माणसं खूप जास्त काळ घराबाहेर असतात. दुसरं म्हणजे कोणतीच नोकरी, कोणतच काम आता पहिल्यासारख ‘सुरक्षित’ राहिल नाही. एकदा चिकटलो की निवृत्तीपर्यंत निवांत हे चित्र आता कोणाच्याही बाबतीत खरं नाही. कामाच्या ठिकाणची स्पर्धा, सतत स्वत:ला सिद्ध करण्याचा तणाव, वाढत्या महागाईने कितीही आला तरी अपुरा वाटणारा पैसा, आरोग्यसेवांचा आणि शिक्षणाचा वाढता खर्च, भविष्याबद्दलची असुरक्षितता ... अशा सर्व गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात आधीच पुरेसा तणाव आहे. सामाजिक काम करत दुस-यांचा तणाव घ्यायची आता आपली तयारी नाही – पैसे देऊन सामाजिक कामात सहभागी होणे जास्त सोयीचे आणि सोपे झाले आहे.

हे झाले वरवर दिसणारे चित्र. पण असे म्हणत असताना आपण हे विसरतो की, जुन्या पिढीतही सामाजिक कामात सहभागी होणा-या लोकांची संख्या मोजकीच होती. शिवाय जुन्या काळी कोणाला – विशेषत: पूर्ण वेळ कार्यकर्त्याला -  जेवायला घालणे किंवा त्याला/तिला गरजेची एखादी वस्तू घेऊन देणे इतपतच काहीचे सामाजिक काम मर्यादित असे. आता पूर्ण वेळ कार्यकर्त्यांच्यांही गरजा वाढलेल्या दिसतात. म्हणजे त्यांना मोबाईल फोन लागतात, लॅपटॉप  लागतात आणि त्यावर इंटरनेटही लागते – म्हणजे ते  ’फेसबुक’वरून विचारांचा प्रसार करू शकतात! ते योग्य की अयोग्य यावर मी भाष्य करत  नाही. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की फक्त समाज बदलला अस म्हणणं चुकीच आहे, संस्थाही बदलल्या, त्यांचे आदर्शही बदलले आणि त्यातल वातावरणही बदललं. कारण संस्थाही समाजाचा एक भाग असतात आणि समाजाला दिशा देण्याचे त्यांचे काम कधीकधी त्या विसरतातही!  ‘जुने काही आता उरले नाही’ ही प्रौढांची नेहमीची  तक्रार असते – त्यात नवं काही नाही. पण आता ४० ते ६० या वयोगटात असलेल्या पिढीने (त्यात मीही आले हे नमूद करते!) काही चुका केल्या आहेत – त्याची फळे आता दिसताहेत.

शिवाय बदलत्या सामाजिक  संदर्भात कोणतीतरी एक विचारप्रणाली सगळ्या  प्रश्नावरचा रामबाण उपाय असेल असा एक भाबडा आशावाद – ज्याच्या आधारे जुन्या पिढीन  काम केलं – तो आता उरलेला नाही. अशा विचारांचा  अनाठायी आग्रह ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे असे तरुण  पिढीलाच काय मलाही वाट्ते. काळ बदलला, प्रश्न बदलले, आव्हाने बदलली – त्यांना तोंड द्यायचं तर आपली विचार करण्याची, विश्लेषण करण्याची पद्धतही बदलायला हवी. अनेक स्वयंसेवी  संस्था या नव्या गरजेकडे डोळेझाक करतात आणि संदर्भहीन होऊन जातात .

आणखी एक वास्तव म्हणजे स्वयंसेवी सामाजिक काम आणि राजकीय पक्ष यांचा दिवसेंदिवस जवळचा होत चाललेला संबंध! गणेशोत्सव मंडळ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान अशा ‘सामाजिक’ कामात एकदा पुरेसे नाव कमावलं की हीच मंडळी राजकीय आखाड्यात उतरताना दिसतात. आणीबाणी आणि त्यानंतरच्या राजकीय भ्रमनिरासानंतर काही लोक ‘राजकीय कामापेक्षा सामाजिक काम जास्त गरजेचे आहे’ अशा विचारांकडे वळले हे नाकारता येत नाही. पण त्याचबरोबर सामाजिक कामाचे राजकीयीकरण होण्याच्या प्रक्रियेला याच काळात गती मिळाली. अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी मंडळावर राजकारणात सक्रिय असणारे लोक असतात. एका अर्थाने राजकारण हा समाजकारणाचाच एक पैलू आहे असं शिक्कामोर्तब यातून होतं असं म्हणता येईल. आणि दुसरं असही म्हणता येईल की स्वयंसेवी काम ही सक्रिय राजकारणात शिरण्याची केवळ एक पायरी झाली आहे. समाजकारण आणि राजकारण यांच्या या नात्यामुळे अनेक लोक सामाजिक कामापासून दूर गेले असे म्हटल्यास अवास्तव ठरणार नाही. आज चाळीस ते पन्नास वयोगटात असणारे आणि त्यांच्या तरुणपणी स्वयंसेवी कामात सक्रिय सहभागी असणारे अनेक लोक याची साक्ष देतात. ‘वेळ मिळत नाही’ हे अनेकदा समोरच्या माणसाला दुखवायचे नाही म्हणून सांगायला चांगले कारण असते अशा वेळी.

शिवाय गेल्या काही वर्षांत मनोरंजनाची बरीच साधन घरबसल्या उपलब्ध झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून माणसांना घरात वेळ घालवाच साधन सापडलं आहे. पूर्वी नुसतं निवांत रिकामं बसण्यापेक्षा ‘काहीतरी चांगल’ काम करू अशा विचारांनी माणसं संस्थेत, संघटनेत यायची, पडेल ते काम करायची आणि जे काम करायला मिळेल त्यात समाधान मानायची. पण चोवीस तास कार्यक्रम दाखवणा-या वाहिन्यांनी माणसांचे व्यवहार बदलून टाकले. बसल्या जागी जे मिळेल त्यात समाधान मानायचं – वेळ, पैसा आणि दगदग वाचली अस म्हणायचं – अशी एक पद्धत पडत गेली.  जर जुन्या काळी असा चोवीस तास रतीब घालणार मनोरंजन असतं तर आपला समाज कसा घडला असता याचा विचार कधी कधी मनात येतो.

‘कर्मण्येवाधिकारस्ते’चा कितीही जप केला तरी आपल्याला फळाची अपेक्षा असतेच. सामाजिक  बदल हे काही चमत्कारासारखे  एका रात्रीत किंवा अल्प काळात होत नाहीत. त्याला गरज असते दीर्घ काळ काम करण्याची. झटपट  यश मिळवण्याची मनोवृत्ती  जीवनाच्या इतर क्षेत्रात पसरत असताना हे क्षेत्र तरी त्याला अपवाद कसे ठरेल? अपयश पचवायला एक वेगळी ताकद लागते, अपयशातून धडे शिकून स्वत:मध्ये, स्वत:च्या कामाच्या धोरणांत आणि  शैलीत बदल घदवून आणायला, एकाकीपणा स्वीकारायला वेगळे धाडस लागते. अशा धाडसाबद्दलचे ध्येयवादी आकर्षण कमी होत चालले आहे आणि त्याबद्दल गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आली आहे.

स्वयंसेवी संस्थांवर आणखी एक मोठा आक्षेप असा असतो की तिथं मुख्यत्वे ज्यांचा स्वत:चा तो प्रश्न नसतो, ते लोक काम करत असतात; जे खाऊन पिऊन सुखी असतात ते काम करत असतात. सद्यस्थितीआस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचे अनेक फायदे हे लोक घेत असतात आणि म्हणून व्यवस्था बदलण्याकडे त्यांचा कल नसतो. जे करायचे, जे साधायचे त्यासाठी साधन असणारांची त्या व्यवस्थेपासून मुक्तता आहे का हा एक वेगळाच मुद्दा आहेहे विधान अर्थातच बिगर सरकारी संस्थांनाही लागू पडते. 

(लेख मोठा आहे त्यामुळे बाकी पुढच्या भागात!) 

Saturday, October 22, 2011

९६. खेळ


माझी स्मरणशक्ती अगदी वाईट आहे, हे मी पूर्वीही तुम्हाला सांगितलं आहे – माझ्या सवयीप्रमाणे अनेकदा सांगितलं आहे बहुतेक! त्याबद्दल (म्हणजे अनेकदा सांगण्याबद्दल नाही तर स्मरणशक्ती वाईट असल्याबद्दल)  मी फारशी चिंता कधीच केली नाही आजवर. पण कधीकधी त्यामुळे मला अगदी कानकोंड व्हायला होतं. आजचा दिवसही त्यातलाच एक होता.

एका मीटिंगची तयारी करायची होती आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी मला नेहमीपेक्षा एक तासभर आधी बाहेर पडायचं होतं – म्हणून सकाळी मी घरातून नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडले. मेट्रो स्थानकात मी वेगळ्या वेळी आल्यामुळे माझ्याभोवतीची गर्दीही वेगळीच होती. नेहमीच्या सहप्रवासी स्त्रिया बोलत नसल्या तरी एकमेकींकडे पाहून आम्ही हसतो – इतकी दखल आम्ही नक्की घेतो. क्वचित कोणीतरी ’खूप दिवसांनी दिसताय तुम्ही’ असं मला म्हणते आणि मग मी माझ्या ताज्या प्रवासाचा वॄत्तांत तिला ऐकवते असंही घडतं. आजही मी खूप काळाने मेट्रोने चालले होते पण ओळखीचं कोणी मला भेटण्याची शक्यता नव्हती.

मेट्रो आली, त्यात चढले. बसायला जागा मिळाली. माझा मेट्रोचा प्रवास जमिनीखालून असतो, त्यामुळे बाहेर पाहण्यासारखं काही नसतं अंधाराव्यतिरिक्त. आतमध्ये मग उगाच नजर इकडे तिकडे फिरत राहते आणि अनोळखी लोकांकडे असं पहात राहणं (त्या सगळया स्त्रिया असल्या आणि पाहणारी मी पण एक स्त्री असले तरी) जरा विचित्र वाटतं. बरं, प्रवास जेमतेम वीस मिनिटांचा असतो माझा – त्यामुळे पुस्तक काढून वाचत बसायलाही फारसा वाव नसतो. मग डोळॆ मिटून बसणं हा एकमेव पर्याय राहतो.

मी डोळॆ मिटणार तेवढ्यात माझ्या समोर बसलेली एक तरूण मुलगी ’हॅलो’ असं म्हणत माझ्याकडे पाहून हसली. प्रतिक्षिप्त क्रियेने मी पण हसले – पण मी ’हॅलो’ म्हटलं नाही तिला. कारण ती मुलगी काही माझ्या ओळखीची नव्हती. बहुधा तिने माझ्या शेजारच्या एखाद्या स्त्रीला संबोधलं असावं असं मी गॄहित धरलं. ओळख नसली तरी हसायला चालतं मला – बोलायलाही चालतं म्हणा! एरवी बोललेही असते मी – पण आज गप्प बसले.

माझ्या डाव्या –उजव्या बाजूच्या दोन्ही स्त्रिया किंवा खरं तर आजुबाजूचं  कोणीच त्या मुलीशी काही बोललं नाही म्हणून मी जरा विचारात पडले. हे अर्थात लिहायला भरपूर वेळ लागतो आहे – पण तुम्हाला वाचायला जेवढा वेळ लागतो आहे त्याच्या शतांश कालावधीत हा प्रसंग घडत होता. मी त्या मुलीच्या चेह-याकडे पहात होते. तिला एकदम अपमान झाल्यासारख वाटलं आणि तिच्या चेह-यावरचं हसू मावळलं. तिचे डोळे एकदम निराश झाल्यासारखे वाटले. तिने एकदम नजर खाली झुकवली आणि मोबाईलचा इअरफोन काढून ती गाणी ऐकायला लागली. पण ती अस्वस्थ झाली होती.

अस्वस्थ तर मी पण झाले होते – कारण त्या मुलीला मी कुठतरी पाहिलं आहे असं मला तोवर वाटायला लागलं. मेंदूला ताण दिल्यावर तिचा चेहरा, तिचं हसणं, तिचा आवाज, तिचे डोळॆ ….. सगळे माहितीचे आहेत असं वाटायला लागलं. ही मुलगी मलाच ’हॅलो’ म्हणाली याची मला खात्री पटली. मग मी तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायला लागले पण आता ती माझ्याकडे बघतही नव्हती. आमच्यातलं  ते दोन तीन फुटांच अंतर एकदम मैलांच झालं जणू. एकदा मला वाटलं, की बसायला मिळालेली जागा सोडून तिच्याजवळ जावं आणि तिच्याशी बोलावं. पण मला आता तिची खात्री नव्हती. आणि आता ती माझ्याकडे बघतही नव्हती त्यामुळे ती माझ्याशी बोलली होती की आणखी दुस-याच कोणाशी अशी शंका माझ्या मनात परत निर्माण झाली.

माझ्याही नकळत मी तिच्याकडे पहात राहिले. जितक जास्त पहावं तितक ती मुलगी ओळखीची आहे असं मला वाटायला लागलं. माझी तिच्यावर सतत रोखलेली नजर तिला जाणवली असावी, कारण तिनेही परत एकदा माझ्याकडे पाहिलं. तो क्षण अचूक पकडून मी तिला विचारलं, “रोज तुम्ही मेट्रोने येता का?”

तिने नुसतीच मान डोलावली. पण आता तिचा चेहरा जरा सैलावला. तेवढा धागा पुढे नेत मी पुन्हा म्हणाले, “पण आपण आज पहिल्यांदाच मेट्रोत भेटतो आहोत, नाही का?”

आता ती छान हसली. मग म्हणाली, “आज चाणक्यपुरीच्या कार्यालयात येणार आहेस का? रेस कोर्स स्थानकावर उतरायला लागेल आपल्याला ……”

तिचा आवाज ऐकून मला एकदम कळल की ही शहनाज आहे.

आणि मला स्वत:ची लाज वाटली.

शहनाजला मी गेले एक वर्षभर ओळखते. तिला मी किमान पंचवीस वेळा भेटले आहे. तिच्याशी मी किमान शंभर वेळा फोनवर बोलले आहे – शहनाज माझ्या एका ऑफिसमधली रिसेप्शनिस्ट –टेलिफोन  ऑपरेटर आहे.

शहनाज स्वभावाने फार चांगली आहे. ती कार्यतत्पर आहे. तिच्या कामाची गुणवत्ता नेहमी चांगली असते. ती अनेक गोष्टी स्वत: होऊन करते – तिच्यात सांगकामेपणा अजिबात नाही. तिने मला अनेकदा मदत केली आहे. मी कधीही त्या कार्यालयात गेले की शहनाज माझ स्वागत करते, मी कशी आहे ते विचारते, मला आवडते ती  कॉफी  देते. आणि मुख्य म्हणजे फक्त माझ्याशीच नाही तर कार्यालयात येणा-या सगळ्यांशी शहनाज तितक्याच अगत्याने वागते. आणि हे ती सगळ मनापासून करते. माझ शहनाजबद्दल फार चांगलं मत आहे – तसं मी त्या कार्यालयाच्या वरिष्ठ अधिका-यांना एकदा लेखी कळवलंही आहे.

मी आता शहनाजशी मनापासून गप्पा मारते. पाचच मिनिटे मिळतात आम्हाला कारण रेस कोर्स स्थानक आता आलंच आहे. शहनाज आता मनापासून हसते आहे. मेट्रोतून ती उतरते, दरवाजे बंद होतात तेव्हा हात हलवून आम्ही एकमेकींचा निरोप घेतो. मी अजूनही अस्वस्थच आहे.

मी शहनाजला लगेच का ओळखलं नाही हा प्रश्न मला पुन्हा एकदा सतावतो आहे. कोणीतरी खूप काळाने भेटल्यावर, कोणीतरी तितक्या नियमित न भेटणारं समोर आल्यावर मी न ओळखणं  स्वाभाविक आहे. पण मला नेहमी भेटणा-या, जिच्याबद्दल माझ चांगलं मत आहे अशा मुलीला मी ओळखू नये याच मला वाईट वाटलं.

एक शक्यता आहे की शहनाज मेट्रोत भेटेल असं मला वाटलं नव्हतं – त्यामुळे अनपेक्षितपणॆ एखादी व्यक्ती भेटल्यावर आश्चर्य वाटावं हे बरोबर आहे, पण ओळखच पटू नये हे काय आहे? शहनाजला मी एका विशिष्ट भूमिकेत कार्यालयात पाहिलं होत नेहमी – एक माणूस म्हणून मी तिला आजवर कधी पाहिलंच नव्हतं का? माणूस म्हणजे त्याचं/तिचं काम – अशी तर माझी काही धारणा होऊन नाही ना बसली?  स्वत:च्याच विश्वात मग्न होऊन मी इतरांची जाणीवही न राहण्याइतपत असंवेदनशील तर नाही ना बनले? माणसांना विसरणं हा माझा स्वभाव बनत चाललाय का? तंद्रीत राहून मी वास्तवापासून तुटत तर नाही  ना चालले?

माझ्या आयुष्याला एक विलक्षण गती आहे, त्यात सतत नव्या गोष्टी घडत राहतात. त्यामुळे जुन्या गोष्टी मागे पडत जातात; त्याचे फायदेही आहेत. पण सतत जुन्याची जागा नव्याने भरून काढणं  असा एक खेळ तर मी खेळत नाही ना? जगणं  म्हणजे जणू मनाचा एक खेळ आहे अशा माझा अविर्भाव आहे का? त्यातून काय निष्पन्न होणार आहे नेमकं? आता हात पाय चालते फिरते आहेत, इंद्रिय शाबूत आहेत म्हणून दरवेळी हा खेळ तितक्या उत्साहाने मला खेळता येतो.

पण समजा मला दीर्घायुष्य मिळालं तर असाही एक काळ येईल की जेव्हा  निसर्गनियमानुसार मला नवं काही रचता येणार नाही. जे रचलं ते सगळं  नामशेष होत जाणार हळूहळू. मग जेव्हा नवं काहीच घडणार नाही आयुष्यात, तेव्हा मला जुनं नेमकं काय आठवेल? आणि जे जुनं मला आठवेल – ती माणसं, त्या  जागा, ते क्षण तोवर माझे उरतील का? आणि ते जर नसतील तर जी पोकळी निर्माण होईल, त्यात मला आजच्यासारखा नवा खेळ रचता येईल का? 
*

Sunday, October 16, 2011

९५. कौल


सिल्वासाकडून दुधनीला चाललो होतो आम्ही तेव्हा भर दुपारची वेळ होती. सकाळच्या एका गावच्या भेटीने बरेच नवे प्रश्न समोर आणले होते. ते प्रश्न सोडवण्यात माझ्या सोबत असलेल्या लोकांना फारसा रस नव्हता याचं मला त्या प्रश्नांपेक्षाही वैषम्य वाटत होतं. प्रश्न सोडवायची इच्छा असेल तर कितीही अवघड वाटणारा प्रश्न सुटतो असा माझा आजवरचा अनुभव. आणि काही करायचंच नसतं, तेव्हा अनेक नवे प्रश्न निर्माण होत जातात असाही अनुभव. मी खरं तर त्याच विचारांत होते.

दादरा नगर हवेली या केंद्रशासित (तिथ ’संघशासित’ असा उल्लेख आहे सिल्वासाच्या स्वागत कमानीवर!) प्रदेश नवा होता माझ्यासाठी. जेमतेम ५०० (अगदी नेमकं सांगायचं तर ४८७!) चौरस किलोमीटरचा हा टापू. सिल्वासा ही त्याची राजधानी; गुजराथी आणि मराठी या दोन अधिकृत भाषा. तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला प्रदेश. मराठ्यांच्या नाविक दलाने पोर्तुगीजांचं एक जहाज बुडवलं. पण इंग्रजांच्या विरोधातल्या धोरणाचा एक भाग म्हणून मराठ्यांनी पोर्तुगीजांना १७८३ मध्ये नगर हवेलीतून पैसा वसूल करण्याचे अधिकार बहाल केले एका करारान्वये आणि पुढे १७८५ मध्ये पोर्तुगीजांनी दादरा विकत घेतलं. पोर्तुगीजांची या प्रदेशावरची सत्ता १९५४ पर्यंत अबाधित राहिली. पण हा भाग भारतात ’विलीन’ व्हायला मात्र १९६१ साल उजाडावं लागलं – असा काहीसा इतिहास वाचला होता. पण इतिहासात – म्हणजे इतिहासाच्या  पुस्तकात – अनेक गोष्टी नसतात. त्या भागात गेलं की अनेक बाबी नव्यानेच कळतात. सुरेश या भागातला, खानवेलमधला आदिवासी तरूण. सकाळपासून काही आमच्या सोबत नव्हता, त्यामुळे त्याच्याशी काही फारसं बोलणं झालेलं नव्हतं.त्याच्याकडून काहीतरी ऐकायला मिळेल  अशी माझ्या मनात अपेक्षा निर्माण झाली.

रस्त्याच्या डाव्या बाजूला अचानक भरपूर पाणी दिसलं. “हे मधुबनी धरण” – सुरेशने मला सांगितलं. मी माझी चिंता बाजूला ठेवून तो जे काही सांगत होता त्याकडं लक्ष द्यायला लागले. “नगर नावाचं गाव होतं या डोंगराच्या पायथ्याशी पूर्वी. हे धरण बांधताना ते गाव पाण्यात बुडालं. तिथला देव – नगरदेव – आता त्याचं देऊळ इथं रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. “ मी ऐकते आहे हे पाहिल्यावर सुरेशला आणखी स्फुरण चढलं.

मग सुरेश आणि इतरांनी मला अनेक कथा सांगितल्या. नगर गावातून ही मूर्ती वरती आणायला कसे कष्ट पडले सगळ्यांना;  या नगरदेवाची बहीण म्हणजे डहाणूची महालक्ष्मी – तिच्याकडे तो वर्षातून एकदा (बहुतेक दिवाळीच्या सुमारास) जातो तेव्हा आकाशात कशी ज्योत दिसते; हा देव कसा नवसाला पावतो; त्याची जत्रा कधी असते – अशा असंख्य कहाण्या. त्या सगळ्या बोधप्रद नसल्या तरी त्यातून इथल्या माणसांची मनं कशी चालतात, त्यांची जीवनदृष्टी काय आहे हे थोडंफार समजतं – आणि प्रवासात करण्यासारखंही काही नव्हतं दुसरं – म्हणून मी ऐकत राहिले.

कोणी न सांगताच चालकाने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. आम्ही सगळे खाली उतरलो. रस्त्याच्या खाली मधुबनी धरणाचं, त्या पलिकडच्या गावांचं रमणीय दॄष्य दिसत होतं. ते पाहून मी एकदम ताजीतवानी झाले. 
“ते नगरदेवाच देऊळ” सुरेशन मागच्या बाजूला उजवीकडं हात दाखवत सांगितलं. “अरे, ताईंना आपण घेऊन जाऊ तिकडं” मला न विचारताच दुस-याने हुकूम सोडला. बहुतेक वेळा लोकांना काही गोष्टी स्वत:ला करायच्या असतात आणि ते आपल्याला निमित्त बनवतात हे मला माहिती आहे. मी स्वत:शीच हसले आणि त्यांच्याबरोबर देवळाकडे निघाले.

पांढ-या रंगातलं ते एक साधं देऊळ होतं, नवंच बांधकाम असावं आणि फारसं मोठंही नव्हतं. एक सोडून दोन घंटा वाजवून  (मला देवळातल्या घंटा वाजवायला आवडतं – का ते माहिती नाही!) मी देवळात प्रवेश केला. शेंदुराने माखलेली एक मूर्ती होती – तिच्या डोक्याशी ध्वज होते, तिच्या चेह-यावर दोन डोळॆ कोरलेले होते, समोर त्रिशूळ होता. मागच्या भिंतीवर एक पाटी होती, तिच्यावर या देवाची आरती लिहिलेली होती. ती वाचून हा देव म्हणजे भैरोबाचा अवतार इतकं समजलं. म्हणजे या देवाचं ’कुळ’ समजलं म्हणा ना – आता त्याविषयी अधिक माहिती शोधण्याइतके पुरेसे धागे मला मिळाले होते! त्या देवाच्या (म्हणजे  मूर्तीच्या ) डोळ्यांखाली दोन छोटे खड्डे दिसत होते – नैसर्गिक असतील ते – पण मी उगीच विचारलं – ते काय आहे?

त्या सगळ्या ऐकणा-यांना माझा प्रश्न कधी नाही ते आवडला होता. दोघा तिघांनी एकदमच उत्साहाने बोलायला सुरुवात केली. त्यातून इतकं कळलं – की हा देव एकदम शक्तीमान आहे (कुठला नसतो?). आपण एक इच्छा मनात धरून बसायचं देवापुढे – ती इच्छा पूर्ण होणार असेल तर ती सुपारी आपल्यापर्यंत येते नाहीतर ती आपल्या उजवी- डावीकडं जाते. त्यातून मला काही अर्थबोध व्हायच्या आत एकाने मंदिराच्या पुजा-याला फोन लावला होता आणि तो पुजारी पाच मिनिटांत पोचणार तिथं -  येऊन पोचलाही.

इथले आदिवासी कोकणा – आणि हा महाराष्ट्राला जवळचा भाग. त्यामुळे मी पुजा-याशी अंदाजाने मराठीत बोलले आणि तो एकदम खूष झाला. मग त्या सगळ्यांनी मला  “तुमची इच्छा सांगा” अस भरीला घालायला सुरुवात केली. मला खरं तर त्यावेळी दुपारचे दोन वाजून गेल्यामुळे सडकून भूक लागली होती –पण सर्वशक्तीमान परमेश्वराकडे जेवणासारखी इतकी साधी गोष्ट काय मागायची, ही मागणी पूर्ण करणं तर आमच्या संयोजकाच्या हातात आहे  असा विनोदी विचार माझ्या मनात आला. पण हा विचार त्या लोकांना सांगणं शक्य नव्हतं आणि मला त्यांच्या श्रद्धा आणि भावनाही दुखवायच्या नव्हत्या. त्यामुळे मी थोडं गंभीरपणाने “काय मागायचं? माझ्या लायकीपेक्षा जास्तच दिलं आहे देवाने मला आजवर” असं म्हणाले. माझ्याही नकळत मी हे फार प्रामाणिकपणाने म्हटलं असणार – कारण त्यावर सगळे गप्प झाले.

मग माझा एक सहकारी पुढे आला. हा चांगला शिकला-सवरलेला माणूस.  ’मानववंशशास्त्र’ असं अवघड नाव असलेल्या विषयात संशोधन केलेला, मोठ्या पदावर सरकारी खात्यात काम करणारा. मी कुतुहलाने त्याच्याकडं पाहिलं – पण तो वेळ निभावून न्यायला पुढं आला नव्हता तर त्याची खरंच मनापासून इच्छा होती या देवाचा कौल घेण्याची. त्याची तयारी होईपर्यंत मी पुजा-याशी गप्पा मारल्या. दिवसातून साधारणपणे किती लोक इथं येतात आणि किती लोकांना नगरदेवाचा कौल मिळतो याची मी चाचपणी करत होते. पण पुजारी हुषार होता – त्याने मला काही ताकास तूर लागू दिला नाही.

आमचा सहकारी डोक्यावर रूमाल बांधून आणि पुढे एक रूमाल पसरून नम्रपणे देवासमोर बसला. पुजारी त्याला म्हणाला, “सांगा तुमची काय इच्छा आहे ते.”

मोठ्याने बोलून इच्छा सांगायची आहे हे पाहिल्यावर आमचा सहकारी बिचकला. देवाचा आणि त्याचा खासगी संवाद असेल अशी त्याची कल्पना होती – पण प्रत्यक्षात तो सार्वजनिक संवाद होता. “तुम्ही पुजा-याच्या कानात सांगा पाहिजे तर” अशी सुरेशने तडजोडीची सूचना केली. पण आता आमच्या सहका-याची पंचाईत झाली होती. मग त्या विश्वसुंदरी स्पर्धेतल्या तरूणी कशा उदात्त विचार व्यक्त करणारी वाक्यं बोलतात – तशी काहीशी ’सर्वे भवन्तु सुखिन:’ अशा थाटाची काहीतरी मागणी त्याने केली.  “एकावर एक फ्री “चा जमाना असल्यामुळे असेल बहुधा, आमच्या सहका-याने एका दमात आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि नोकरीतली स्वत:ची प्रगती अशा तीन इच्छा व्यक्त केल्या.

आता आमची नजर पुजा-याकडे वळली. त्याने सोबतच्या प्लास्टिकच्या पिशवीतून एक सुपारी काढली.कोकणी भाषेत देवाशी काहीतरी संवाद केला – म्हणजे या सहका-याची इच्छा देवाला सांगितली – थोडक्यात देवाला आमच्या      सहका-याची हिंदी भाषा कळत नसल्यामुळे त्याने कोकणीत देवाला ते समजावून सांगितलं. सर्वशक्तीमान देवालासुद्धा आपल्यासारखी भाषेची अडचण जाणवते तर – असा आणखी एक विनोदी विचार माझ्या मनात आला. सगळॆजण एकदम स्तब्ध उभे होते. मधेच मी पुजा-याला “फोटो काढला मी, तर चालेल का तुम्हाला?” असं विचारून घेतलं – त्याने होकार दिला.

ती सुपारी घरंगळत आमच्या सहका-याच्या डाव्या बाजूला गेली. आता जगात अनेक लोक अनेक विरोधाभासी गोष्टी देवाकडे मागत असतात – तो तरी कशा त्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार? मला वाटलं की संपला प्रयोग. पण पुजा-याने दुसरी सुपारी काढली – तीही उजवी-डावीकडं कुठंतरी गेली. मग तिसरी – मग चौथी. जसजशी सुपा-यांची संख्या वाढायला लागली तसतसा पुजा-याच्या देवाशी चाललेल्या संवादाचा स्वर बदलायला लागला. साधी नम्र प्रार्थना आता काकुळतीची झाली, लालूच दाखवणारी झाली, धमकीची झाली, करूणेची झाली. भक्तीचे विविध प्रकार, वेगवेगळे सूर त्या पाच मिनिटांत मला दिसले हाच खर तर मोठा चमत्कार होता.

अखेर चौदावी –पंधरावी सुपारी थेट आमच्या सहका-याच्या समोर पसरलेल्या रूमालावर येऊन थबकली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. “भगवान का प्रसाद मिल गया” अस माझा सहकारी भावूकपणे मला म्हणाला तेव्हा मी त्याची नजर चुकवली – कारण मला खूप हसू येत होतं त्या कर्मकांडाचं. त्याचा एवढा विश्वास आहे या सगळ्यावर तर मग पहिली न आलेली सुपारी हीच परमेश्वराची इच्छा असं मानून मुकाट माघारी का परतला नाही तो? आपल्या इच्छा अनंत असतात, अनंत राहणार – त्यासाठी आपण प्रयत्न करावेत – मिळालं आणि न मिळालं आपल्या इच्छेनुसार – तर ते दोन्हीही तितक्याच श्रद्धेनं ’परमेश्वराची इच्छा’  म्हणून का घेता येऊ नये आपल्याला? स्वत:च्या अगदी प्रापंचिक, भौतिक इच्छा आकांक्षांना परमेश्वरी अधिष्ठान शोधण्याचा इतका खटाटोप कशाला?

पण मी गप्प बसले.

संध्याकाळी परतताना एका आदिवासी वस्तीत उतरलो. गप्पा मारता मारता एका मध्यमवयीन आदिवासी गॄहस्थाने मला विचारलं: “माणसाचा धर्म हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा कसा काय असू शकतो? माणसाला जात कशी काय असू शकते? आपण सगळॆ या एकाच धरतीमातेची लेकरं नाही का? मग जमीन एवढी याच्या मालकीची आणि तेवढी त्याच्या मालकीची असली विभागणी कशी काय असते? ज्याला जेवढी गरज तेवढी जमीन त्यानं पिकवावी असं का नाही करत आपण? सूर्य आणि चंद्र आणि पाऊस हेच आपले खरे देव नाहीत का – ते कोपले तर आपलं काय होईल? मग एवढे देव आणि त्यावरून माणसा-माणसांत भांडणं कशाला हवीत? ….”

मी थक्क होऊन आणि अतिशय आदराने त्या आदिवासी माणसाकडं पाहिलं. त्याचा चेहरा रापलेला होता. अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्याचं घर म्हणजे एक झोपडी होती.  जगाच्या भाषेत बोलायचं तर त्याच्याकडं काही नव्हतं – पण त्याच्याकडे परमेश्वराकडं पाहण्याचा एक विशाल आणि सखोल दॄष्टिकोन होता….. शक्यता आहे की हा त्याचा केवळ बोलण्याचा भाग असेल. पण आम्ही तरी बोलण्याविना आणखी काय मोठं वेगळं करत असतो? 

देव मूर्तीत जरूर पहावा पण फक्त तो तिथंच पाहू नये, सर्वत्र पहावा -  हे विसरून आम्ही कर्मकांडांना चिकटून राहतो .. आमच्या स्वार्थाला आम्ही भक्ती हे गोंडस नाव देतो…

जिवंत माणसांशी संवाद साधण्याऐवजी, त्यांना समजून घेण्याऐवजी आम्ही दगडी मूर्तींना कौल लावत बसतो …
खरा कौल कसा मिळणार मग आपल्याला?


*******
तुम्हाला कदाचित 'भक्तीहीनता' वाचायला आवडेल. 

Tuesday, October 11, 2011

९४. अनिवार्य

“अनिवार्य”
आज सकाळी झोपेतून जागी होत असताना कुठून कोण जाणे पण हा शब्द मानगुटीवर येऊन बसला.
मी पूर्वी कधीतरी लिहिलं आहे की मला असंख्य स्वप्नं पडतात – इतकी जास्त की खरं काय आणि स्वप्न कोणतं याबाबत अनेकदा माझा गोंधळ होत राहतो.
त्यामुळे हा ’अनिवार्य’ शब्द बहुतेक स्वप्नातला असावा अशी मी स्वत:ची समजूत घातली आणि रोजच्या कामाला लागले.
पण तास दोन तासांनी लक्षात आलं, की ’अनिवार्य’ अजून आहे सोबत.
“माझा नेमका अर्थ काय?” “मी म्हणजे नक्की काय?” असले भयंकर गंभीर प्रश्न तो शब्द मला विचारत होता. एक प्रकारचं आव्हान होतं ते – फक्त ते खेळकरपणे सामोर येत होतं.
मनाला सतावणा-या विचारांना तोंड द्यायचं माझं एक धोरण आहे – दुर्लक्ष करण्याचं! पण “अनिवार्य” त्याला पुरून उरला. कुठुनही एखादी फट सापडली, एखादा क्षण जरी मोकळा मिळाला की हा पठ्ठा “सांग बघू माझं रहस्य” असा माझा पिच्छा पुरवत राहिला.
तसा हा शब्द काही अगदी अनोळखी नाही.
“प्रश्नपत्रिकेतील पहिले दोन प्रश्न अनिवार्य आहेत” हे शाळकरी वयात वाचलं होतं. क्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ’अनिवार्य षटकं’ असतात हे ऐकलं होतं.
अखेर “अनिवार्य”ला गप्प बसवायचं म्हणून मी म्हटलं, “माहिती आहे रे बाबा! अनिवार्य म्हणजे सक्तीचं, अटळ, ज्यापासून सुटका नाही असं …”
अनिवार्य त्यावर मोनालिसासारखं गूढ (म्हणजे न कळणारं) हसला. म्हणाला, “ हे समानार्थी शब्द झाले; माझ्या कुळातले. पण म्हणजे मी तुला समजलो नाही हे कबूल का करत नाहीस सरळ?”
मी जरा वैतागले. पण नशीब माझं की त्यानं मला “सक्ती म्हणजे काय?”, “सुटका म्हणजे काय?”, “नसणं म्हणजे काय?” – असले प्रश्न विचारले नाहीत. कारण याही शब्दांचे नेमके अर्थ मला माहिती नाहीत. अनेक शब्द मी केवळ सरावाने आणि अंदाजाने वापरते. म्हणून बहुतेक मी आणि वाचणारे, मी आणि लिहिणारे, मी आणि बोलणारे, मी आणि ऐकणारे यांच्यात नीट संवाद होत नाही.
“ठीक आहे बाबा! पण तू मला काही क्लू (clue)  तर देशील?” मी नम्रतेनं विचारलं.
“क्लू? म्हणजे काय?” अनिवार्य पक्का मराठी माध्यमवाला दिसत होता.
“अरे, म्हणजे धागा, सूत्र, दिशा, खूण ….. “ मी परत एकदा समानार्थी शब्द अंदाजानेच वापरले.
“मी स्वत:च एक सूत्र आहे,” अनिवार्य शांतपणे म्हणाला.
एकूण अनिवार्यला मला खेळवायचं होतं तर! माझ्या नम्रतेचा परिणाम शून्य होता.
मग मी विचार करायला लागले.
सगळ्यात आधी चिडचिड झाली ती माझा आवडता इंग्रजी – संस्कृत – इंग्रजी शब्दकोष मी दिल्लीत आणायचा आळस केला त्याचा. मग राग आला तो अमक्यांनी सुचवलेला मराठी कोष अजून विकत घेतला नाही त्याचा.
पण मला सारखंच काहीतरी शोधायचं असतं – कोणकोणती पुस्तकं जवळ बाळगायची त्यासाठी?
असो. जे केलं नाही त्याचा विचार करण्यात अर्थ नव्हता.
एक पर्याय होता – गुगलबाबा.
पण का कुणास ठाऊक, मी ठरवलं – बाहेरच्या कशाचा आधार न घेता उत्तर शोधायचं म्हणून. माझा हट्टीपणाच तो!
कामाच्या ठिकाणी गेले. मागच्या आठवड्यातली बरीच कामं बाकी आहेत हे सोमवारी सगळ्यांच्या ध्यानात येतं. त्यामुळॆ धावपळ होती. मीटिंग, फोन, रिपोर्ट, चौकशा, चर्चा .. असं चालू होतं.
मधेच कधीतरी मनात विचार आला – ’अ’ म्हणजे अभाव, नसणं, विरोध – जसं शांती आणि अशांती, स्थिर आणि अस्थिर, शोक आणि अशोक, परा आणि अपरा.    हा ’अ’निवार्य म्हणजे कशाचा तरी अभाव आहे. कशाचं तरी नसणं आहे. कशाचं नेमकं?
लगेच मेंदूच्या एका कप्प्याने आक्षेप घेतला – सगळेच ’अ’ काही विरोध दाखवत नाहीत –’अनुभव’ मधला अ , ’अगदी’ मधला ’अ’ काय दाखवतात? माहिती नाही.  अ वजा केला तर नुभव आणि गदी या शब्दांना काही अर्थ उरतो का? बहुतेक नसावा – कारण नुभव आणि गदी हे शब्द वापरात नाहीत. निदान मी तरी कधी ऐकले, वाचले नाहीत.
ग्रेट! तर मला ’अ’ कधी काय सांगतो हेही माहिती नव्हतं तंतोतंत!
एका फोनवर समोरचे गृहस्थ बोलायला यायची वाट पहात असताना मी ’र्य’ ने संपणा-या शब्दांचा शोध घेतेय असं माझ्या लक्षात आलं – शौर्य, क्रौर्य, धैर्य. मौर्य असाही एक शब्द मला आठवला.माझा एक मित्र आणि एक मैत्रिण त्यांच्या लग्नानंतर “मौर्य नेस्ट” नावाच्या इमारतीत रहात होते इतकाच त्याचा संबंध होता. पण “मौर्य साम्राज्य” असाही एक शब्द ऐकला होता. मौर्य म्हणजे मोरे वंशाचे असं गृहित धरलं तर शौर्य म्हणजे शूरपणाचं, क्रौर्य म्हणजे क्रूरपणाचं असा अर्थ आहे का? – मी मुद्दा सोडून भरकटते आहे हे लक्षात आलं माझ्या.
मधेच कधीतरी  ’निर’ शब्द पण अभाव दाखवतो – निर्जळी एकादशी, निर्धूर चूल असं काही आठवलं. पण ’अनिवार्य’ मध्ये केवळ ’नि’ आहे; ’निर’ नाही. शिवाय ’अ’ आणि ’निर’ असे दोन्ही शब्दप्रयोग लागोपाठ करण्यातून काहीच साधलं जात नाही. तसा काही शब्दच नाही असं मी म्हणत असताना मला ’अनिर्वचनीय’ आठवलं!
आणखी काही कामं करत असताना मी ’अनिवार्य’ शब्दाचं लिंग कोणतं असा विचार करतेय हे जाणवलं. पण परिस्थिती अनिवार्य असते, निर्णय अनिवार्य असतो आणि षटक अनिवार्य असतं – म्हणजे सोबतीच्या शब्दाबरोबर अनिवार्य स्वत:ची ओळख विसरून जातो. म्हणजे एका अर्थी तो पाण्यासारखा आहे – अनिवार्य शब्द असा विचार मी करतेय म्हणून मी त्याचा उल्लेख पुल्लिंगी करते आहे. पण ते बरोबर आहे की नाही माहिती नाही.
निवारा शब्दाशी काही देणं-घेणं आहे का याचं? निवारा नाही असं असणं – म्हणजे अनिवार्य का ? पण ते तर भरकटणारं होईल – आणि अनिवार्य तर पक्केपणा, ठामपणा दाखवतं. शिवाय शौर्य शब्दाला जसा एक अर्थ आहे (असा भास होतो) तसा ’वार्य” शब्दाला काही अर्थ दिसत नाही – म्हणजे असं वाटतं तरी!
दिवसभर आमचा – माझा आणि वेगवेगळ्या शब्दांचा -  असा लपंडाव चालू राहिला.
लहानपणी लपाछपीच्या खेळात आपल्यावर राज्य आल्यावर कोणीच आपल्याला सापडू नये म्हणून सारखं पुन्हापुन्हा आपल्यावरच राज्य यावं  - तशी काहीशी माझी अवस्था झाली दिवसभर! एखादा रस्ता दिसतोय असं वाटावं आणि तो रस्ता फिरून पुन्हा पहिल्याच ठिकाणी यावा; चालावं तर भरपूर पण कुठेच पोचू नये अशी मनस्थिती मी पुन्हा एकदा अनुभवली आज.
दमून घरी परतले. अनिवार्यचा अर्थ कळला नाही त्याचं ओझं मनावर घेत आले.
मी एकटी सापडायची तो जणू वाटच पहात होता.
त्याने विचारलं काहीच नाही. गप्प बसला मी बोलेन म्हणून वाट पहात.
बोलण्यासारखं माझ्याकडं काही नव्हतं. ज्या शोधातून गवसलं काही नव्हतं; त्याबद्दल काय बोलायचं म्हणून मीही गप्प  होते.
थोड्या वेळाने ’अनिवार्य’ने एक दीर्घ उसासा टाकला. थोडं मला आणि थोडं स्वत:शीच म्हणाला, “आणि तू म्हणे नियमित लिहितेस! शब्द, भाषा, विचार, भावना .. कशाच्या मुळाशी न जाता केवळ वरवर तू सगळ्या गोष्टी वापरतेस, त्याचा हा अनिवार्य परिणाम…”
अनिवार्य  कोणत्या अनिवार्यतेचा परिणाम भोगतो आहे? ते भोगणे माझ्यासाठीही अनिवार्य आहे का?

********
तुम्हाला कदाचित "सोस" वाचायला आवडेल. 

Sunday, October 9, 2011

९३. काही कविता : १७ सातपुडा

तुझ्या
बेफिकीर ऐटीचा
काही अंश
माझ्यात 
नक्कीच उतरला आहे;
सलगीच्या
तुझ्या विविध त-हा
कदाचित मला
त्याच्याच बळावर 
उपभोगता येत आहेत.

*********

प्रथमदर्शनीच
जीवलग सखा बनून जाण्याची,
अंतरंगाचा ठाव घेण्याची;
सा-यांना मोहात पाडून
स्वत: निर्मोही राहण्याची
तुझी किमया मला नको आहे.

जर अखेर नसायचेच 
कोठे आणि कशातही
तर व्याप उभारण्याचा
निरर्थक खेळ कशाला पुनश्च?

*********

तुझ्या भव्य
प्रचंड अस्तित्त्वाने
बरेच काही पाहिले असेल;
पण तू जणू 
त्यांच्या पल्याड -
सा-या अनुभवांना पेलून
दशांगुळे आत्ममग्न.

इतक्या उंचीवरून,
इतक्या विस्तारातून
तुला जे जग दिसते 
ते कसे आहे 
- मी न विचारताही
तू आस्थेने सांगतोस खरा!

******

तू कधीपासून आहेस?
काय घेऊन उभा आहेस?
कोणाचे काय देणे लागतोस?
काही सायास न करता
केवळ नुसते असण्यातून
असण्याला अर्थ लाभतो का? 
- हे प्रश्न तुला पडत नाहीत?
की 
या सा-याला भेदून जाणा-या
गाभ्याची खोल जाण
मला मुठीत पकडता येत नाही?

******

या सगळ्या खटाटोपात
कणाकणाने
जीर्ण होत चालला आहेस;
तुझे स्वत्व गमावत चालला आहेस 
त्याबद्दल तुला काय वाटते?

जाऊ दे,  असो! 
तू ’वासांसि जीर्णानि...’
वगैरे ऐकवणार
हे मला
आधीच कळायला हवे होते!

******

इतक्या अवाढव्य 
भौतिक पसा-यासह
तुला इकडे तिकडे 
भटकता येत नाही -
याचे नाही म्हटले तरी
मला वाईटच वाटते.

तुझे बोट धरून
रोजच्या गर्दीत हिंडायला
कदाचित आवडले असते मला.

सारे मागे ठेवून
केवळ तुझी ओढ लेवून
तुला भेटणारी मी
आणि एरवी
माझ्या जगात वावरणारी मी
यात फरक आहे
- हे एव्हाना 
तुझ्या लक्षात आलेच असेल.

हृदयांच्या नात्यांत
असले किरकोळ तपशील
मन मोडून टाकत नाहीत 
- हे शिकते आहे मी तुझ्याकडून.

******

तुझी ही सात रूपे;
सात अवस्था, सप्त स्वर;
अग्नीच्या झळाळत्या सात जिव्हा;
अज्ञाताचा प्रदेश धुंडाळणारी
सात विराट पावले; 
आकाशात अकस्मात उमलणारे
इंद्रधनुचे सात रंग;
कर्मयोगी सूर्याच्या रथाचे
सात अवखळ अश्व;
महारूद्राच्या नर्तनाने 
डगमगणारे सप्त पाताळ;
समाधीमध्ये अलगद रूजलेले
ते सात ऋषीवर
अजाणतेपणी वाहिलेले
वेदनेचे सात दगड;
ज्यांचा थांग नाही
असे सप्त समुद्र;
आणि मीलनास उत्सुक
सात खळाळते प्रवाह;

अव्यक्त असणारे 
तुझे अन माझे 
सात युगांचे नाते;
'सत्'च्या  तेजाने उजळलेली
तुझी ही सात शिखरे.....

******
तू सप्त; तू व्यक्त.
तू तप्त; तू मुक्त.
तू आकाश.
तू प्रकाश.
तू प्राण.
तू आण.
तू काळाची जाण.

****

पंथ पुष्कळ झाले, आता
भटकंती झाली रगड;
त्रैलोक्याच्या नाथा, फिरून
एकवार दार उघड!! 

सातपुडा, २५ नोव्हेंबर २००४

Tuesday, October 4, 2011

९२. पूल


मी ओरिया बोलणा-या स्त्रिया आणि मुला-मुलींमध्ये आहे. त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि मला ओरिया/ओडीया बोलता येत नाही, पण आमच्यात संवाद चालू आहे. माझ्यासोबत अनुवाद करणारे म्हणून दोन तीन लोक आहेत – पण त्यांना पुरुषांशी बोलण्यात जास्त रस आहे. माझ्या ओडिया न येणा-या सहका-यांनी त्या अनुवादकांना जणू बांधून ठेवले आहे. त्या अनुवादाकांवर अवलंबून बसले तर मला काहीच बोलता येणार नाही इथल्या लोकांशी हे माझ्या चांगलेच लक्षात आले आहे कालच्या अनुभवावरून. म्हणून मी एकटीच गावात भटकते आहे.


मला पाहून स्त्रिया माझ्याभोवती गोळा होतात. मी त्यांना त्यांच्या घराबाबत विचारते. भाषा येत नसल्यामुळे आमचे बोलणे हातवारे आणि खाणाखुणा यांच्या माध्यमातून चालले आहे. मी त्यांच्या घराकडे बोट दाखवून आत जायची इच्छा व्यक्त करते आणि त्या मला घरात घेऊन जातात. काल दोन गावांत जाऊन आल्यामुळे मी काही ओडिया शब्द उचलले आहेत. जमलेल्या स्त्रियांना किती मुले आहेत, ती शाळेत जातात का, पाणी किती लांबून आणावे लागते, स्त्रियांचा स्वयंसहायता समूह आहे का, त्यांच्याकडे किती गायी आहेत, रोज त्या काय खातात, जळणासाठीचा लाकूडफाटा आणायला जंगलात किती लांब जावे लागते असे माझे अनंत प्रश्न.

कधीकधी आमचा गोंधळही होतो. उदारणार्थ मी विचारते की “अंगणवाडीत किती मुले आहेत?” ती स्त्री म्हणते “गुट्टे”. – म्हणजे एक. आता अंगणवाडीत फक्त एक मूल असणार नाही इतके मला समजते. मी पुन्हा तो प्रश्न विचारते, पुन्हा तेच उत्तर येते – “गुट्टे”. त्या संवादाला बहुधा कंटाळून दुसरी एक स्त्री धावत जाते आणि एका तीन वर्षाच्या मुलाला बखोटीस धरून माझ्यासमोर उभी करते. त्या बाईला एकच मुलगा आहे हे त्या स्त्रिया मला समजावून सांगायचा प्रयत्न करताहेत. “मूल” म्हणजे “मुलगे” हे पुन्हा एकदा माझ्या लक्षात येत. असो. माझ्या इतर प्रश्नांना काय प्रकारची उत्तरे मिळाली असतील हे माझ्या ध्यानात येत. पण त्यामुळे माझे काही बिघडत नाही – आमचे एकमेकींशी बोलणे होते आहे याचाच आम्हाला आनंद आहे.

माझ्याभोवती जमलेल्या स्त्रिया आणि मुले-मुली मनसोक्त हसत आहेत. त्यांची भाषा येत नाही अशा कोणा व्यक्तीला ते सगळे आयुष्यात पहिल्यांदाच भेटताहेत बहुतेक – त्यांना या वास्तवाच प्रचंड आश्चर्य वाटतय. मी एखादा दुसरा ओडिया शब्द बरोबर बोलले की ते मला प्रोत्साहन देताहेत.


आम्ही चार दिवसांत आठ वेगवेगळ्या आदिवासी गावांत जातो आणि मला अनेक गोष्टी पहायला मिळतात. म्हणजे आपल्या लहान मुलांची प्रेमाने काळजी घेणारे पुरुष इथे दिसतात. जे शहरी लोकांना शिकवाव लागत ते हे लोक सहज करतात.



मला ‘न बोलता येणारी’ (मुकी) एक स्त्री भेटते. तिला मला खूप काही सांगायच आहे. ती माझा हात धरून मला तिच्या घरात ओढून नेते आणि ती एक चटणी बनवणार आहे त्याची तयारी मला खुणांनी दाखवते. मला तीन स्त्रिया भेटतात – ज्या मला नियामगिरीतल्या धरणी मातेच्या देवळात घेऊन जायला तयार आहेत. त्यांची अट एकच आहे – मी साडी नेसून आलं पाहिजे. त्यांच्या धरणी मातेला सलवार-कुर्ता चालत नाही आणि आज मी तो घातलेला असल्यामुळे त्या मला देवळात नेऊ शकत नाहीत.

दोन स्त्रियांना ‘त्यांचे नाव त्यांना लिहिता येते’ हे मला सांगायचं आहे. त्या माझ्या वहीत त्यांच नाव आत्मविश्वासाने लिहितात.

मग एक स्त्री मला माझ नाव लिहायला सांगते – मला लिहिता येत की  नाही याची जणू त्या परीक्षा घेताहेत. मला ओडिया येत नाही अस सांगितल्यावर त्या मला ‘इंग्रजीत’ लिहायला सांगतात. मी ते लिहिते. एक मुलगा ते नाव मोठ्याने (आणि बरोबर) वाचतो आणि सगळे पुन्हा एकदा हसतात.

मला एक वृद्ध स्त्री भेटते – ती दुकान चालवते. मी तिचा फोटो काढते तेव्हा ती मला तो फोटो मागते. ती सांगते की तिला तो फोटो तिच्या दुकानात लावायचा आहे. मी तिला तो फोटो ‘नंतर पाठवून देते’ अस म्हटल्यावर ती ‘सगळे असच म्हणतात, पाठवत मात्र कोणी नाही फोटो’ अस म्हणते – हे ती ओडीया भाषेत म्हणते पण मला समजत! भाषा किती भावानावाही असते याच मला तिथ प्रत्यंतर येत!

एका गावात मुली मला नदी किनारी ओढून नेतात. तिथ स्त्रिया अंघोळ करतात, भांडी घासतात आणि कपडेही धुतात. त्यासाठी साधारण ५० फूट उतरून जावे लागते – ती उतरण घसरडी आहे त्यामुळे दोन मुली माझे हात पकडून मला नेताहेत. मी उतरताना मला जो वेळ लागतो आहे त्यामुळे त्या मनसोक्त हसताहेत.

एका गावात देवळाबाहेर एक दगड आहे. बरीच चालल्यामुळे दमून मी त्या दगडावर टेकते ते पाहून एक आदिवासी पुरुष धावत माझ्याकडे येतो. ज्याला मी दगड समजले तो त्यांचा देव आहे असे तो मला समजावून सांगतो. मी या चुकीबद्दल त्याची क्षमा मागते आणि तो हसून मला माफ करतो – ‘आमच्या भावना/श्रद्धा तुम्ही दुखावाल्यात’ अस काही म्हणून लगेच हिंसक व्हायचं असत हे त्याला माहिती नाही. तो मला त्या देवळाची सविस्तर माहिती देतो – तो माझ्यावर खरच रागावला नाही याची जणू ती एक प्रकारची पावती असते! मी मुद्दाम काही केलेल नाही केवळ अजाणतेपणान मी त्यांच्या देवाला दगड समजले हे त्याने सहज स्वीकारल आहे.

नियामगिरी परिसरातली ही माझी पहिली भेट. मी ‘नियामगिरी’च्या प्रथमदर्शनी प्रेमात पडते. त्या हिरव्यागर्द डोंगराच्या आसपासची शांती अभूतपूर्व आहे.  खर तर या परिसरात एका खाण कंपनीच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. म्हणून मी आधी इथ यायला तयारही नव्हते – भीतीने नाही तर आपण कोणाच्या बाजूने आहोत (म्हणजे मी काम करत असलेली संस्था कोणाच्या बाजूने आहे) याच नेमक उत्तर माहिती नसल्याने! पण तरी मी इथ आले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. कारण या भेटीमुळे खर काय चित्र आहे या परिसरातल याचा मला अंदाज आला आहे.


या परिसरातल्या तीन दिवसांच्या वास्तव्याने माझ्या जगण्यात मोलाची भर टाकली आहे. म्हणजे भाषेचा गंध नसताना अस लोकांमध्ये मिसळण, त्यांच्याशी संवाद साधण, त्यांनी खुल्या मनाने मला सामावून घेण .... ही एक प्रकारची जादू आहे आयुष्यातली आणि त्याचा अनेकदा अनुभव घेऊनही प्रत्येक वेळी मला नवल वाटत राहत. केवळ भाषेतून, शब्दांतून संवाद साधण्याची कला आपल्याला शिकवली जाते – पण इथे तर किती वेळा भाषेविना, शब्दांविना केवळ हसण्यातून आम्ही एकमेकांशी नात्यांचे पूल बांधलेले आहेत, परस्पर विश्वासाचे धागे जोडले आहेत!

पुण्यात मी परतते तेव्हा सभोबताली दिवाळीमय वातावरण आहे. सगळेजण आनंदात आणि मजेत आहेत. मला मात्र नियामगिरीच्या आदिवासींची झोपडी आठवते आहे – त्यांच्या ताटात फक्त डाळ-भात आहे, अंगावर पुरेसे कपडे नाहीत, त्यांची गरीबी डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यांना रस्ते नाहीत, वीज नाही, अंघोळ करायची तर ५० फूट खाली उतरून जाण्याला पर्याय  नाही .. मला ते सगळे आठवते.

माझे हे सुखसमृद्धीचे जग आणि नियामगिरीच्या आदिवासींचे मूलभूत सुखसोयींच्या अभावाचे जग यात पूल सांधण्याची, पूल बांधण्याची गरज आहे. अन्यथा आयुष्यभर चालून मी शेवटी मुक्कामाला पोचणार नाही कोणत्याच! मग आजवरचे सगळे पूल निरर्थक होऊन जातील.
**